Tuesday, September 25, 2007

Thursday, September 20, 2007

निवड समितीत मी

६+५ = ७+४ = सावळा गोंधळ
आपल्या टीमचे कॉम्बिनेशन हा निवड समिती तसेच २४ तास आतापर्यंतच्या बातम्या देणार्या वाहिन्यांवर चर्पटपंजरी करून पोटाची खळगी भरणारे अनेक माजी (व आपटलेले) क्रिकेटपटू आणि घरा-घरातील क्रिकेट पंडित यांच्या अतीव जिव्हाळ्याचा व काळजीचा विषय आहे. कोणतीही मॅच चालू असली की बर्याचदा स्टेडिअममध्ये निवड समिती सभासद दिसतात. समोर काय चालू आहे याची अजिबात तमा न बाळगता पुढच्या दौर्यात कुणाला घ्यायचे आणि कुणाला डच्चू द्यायचा हा प्रश्न त्यांच्या चिंताग्रस्त चेहर्यावर स्पष्टपणे
दिसून येतो. जसा जसा सामना पुढे सरकतो तसा हा प्रश्न त्यांच्याकडून खेळाडूंकडे जातो. आणि जिंकायचे चान्सेस असलेला आपला संघ हमखास मार खातो. मग प्रत्येक घरात संघ निवडीपासून, टाकलेल्या कॅचपर्यंत आणि हरभजनने ग्रिप कशी सुधारली पाहिजे इथपासून सचिनने कव्हर ड्राईव्ह कसा खेळायला हवा पर्यंत अनेक गोष्टींचे शव विच्छेदन होते. ज्याना बोलायला कुणी मिळत नाही ते आपले फोर्थ अंपायर, फॉलो थ्रू यासारखे कार्यक्रम बघत बसतात. या सर्व लोकांची निराशा टाळण्याकरता आम्ही असे ठरवले आहे की या वेळी निवड समितीपुढे आदर्श घालून द्यायचा. म्हणजे संघ निवडून द्यायचा.

आता भारत म्हणजे काही ऑस्ट्रेलिया नाही की तुमच्या कडे १५-२० टॉप क्लास प्लेयर्स आहेत, त्यातले कुठलेही ११ उचला, झाला संघ तयार!! त्यामुळे मेंदूच्या खलबत्त्यात विचाराना कुटून, तयार झालेले रसायन तर्काच्या गाळणीतून गाळून घेतल्यावर आम्हाला ही संघरचना योग्य वाटली. सुरुवात करु निवड पक्की असलेल्यांपासून-
सचिन, द्रविड, गांगुली, युवराज, धोनी आणि झहीर.

बाकीच्यांचा विचार करण्याआधी किती फलंदाज आणि किती गोलंदाज ते ठरवू. (आपल्याकडे ऑलराऊंडर नावाची किंवा त्याच्या जवळपास जाणारी एकही गोष्ट नसल्यामुळे अस्मादिकांचे काम बरेच सोपे झालेले आहे.) आपल्या बोलर्सचा एक मोठा गुण आहे. ४ घ्या नाहीतर ५. ३०० रन्स देणार म्हणजे देणार. त्यांचे हे वाखाणण्याजोगे सातत्य आणि आपल्याकडच्या पाटा विकेट्स पाहता ५ बोलर्स खेळवणे म्हणजे आटलेल्या म्हशीला 'मोठी गुणाची आहे हो, कधी कधी लाथ म्हणून मारली नाही' म्हणून चारा घालण्यासारखे आहे. त्यापेक्षा समोरच्या संघाला सुखाने त्यांच्या वाटणीच्या ३००-३२५ धावा करु द्याव्यात, मग ७ बॅट्समन घेऊन पाठलाग करावा, हे भारतीय विकेट्सवरचे पेटंट धोरण वापरावे. चुकून पहिल्यांदा बॅटिंग करावी लागली तर ३०० वर काढाव्यात म्हणजे आपले मंदगती गोलंदाज प्रभावी ठरतील (आता मंदगती म्हणजे फिरकी हे सहज लक्षात येते पण ४-५ वर्षांपूर्वी फक्त मंदगती हा शब्द ऐकला की श्रीनाथच डोळ्यासमोर यायचा.)

तर सांगायचा मुद्दा असा की ७ बॅट्समन ला आमचा पूर्ण पाठिंबा!! आता त्यातले ५ तर नक्कीच आहेत. मग राहतात दोन. या दोन जागांसाठी तमाम अर्जांमधून आम्ही चार नावे निश्चित केली आहेत. दिनेश कार्तिक, सेहवाग, उथाप्पा, गंभीर. आपल्याकडच्या पिचवर technique चा एवढा काही प्रश्न येत नसल्यामुळे (नाहीतर सेहवाग इतका मोठा प्लेयर कसा बरे झाला असता?) आणि जरी थोडाफार आला तरी आपली त्रिमूर्ती + अर्धा युवराज असे साडेतीन लोक पुरेसे होतील असे वाटते. म्हणून आमची पहिली पसंती राहील सेहवाग आणि उथाप्पाला. हा गौतम गंभीरवर अन्याय होत असला तरी एकूण ११ आणि फलंदाजीवाले ७च जण घ्यायचे असल्यामुळे काही करता येत नाही. लोक म्हणतात सेहवागकडे फूटवर्क नाही, तो जास्त वेळ टिकणार नाही. मग त्याला कशाला घ्यायचे? सेहवागला यासाठीच घ्यायचे की तो जास्त वेळ टिकणार नाही. सेहवाग कितीही वाईट फॉर्ममध्ये असला तरी जगातला कुठलाही संघ सचिनवर concentrate करून सेहवागला लायसन्स देण्याचा विचार करणार नाही. त्यामुळे सेहवाग ३-४ ओव्हर टिकला तरी सचिनला निवांतपणे सेटल् होता येईल. म्हणूनच समीकरण असे बनते की

गंभीर + सचिनवर प्रेशर (गंभीर हा स्लो स्टार्टर आहे) किंवा सेहवाग + निवांत सचिन. इथेच सेहवाग बाजी मारतो. सेहवागने कितीही काढल्या तरी चालतील पण त्याने आक्रमक खेळावे. लवकर आऊट झाला तर बाकीचे आहेतच की डाव सावरायला. गांगुली, युवराज आणि द्रविड मधल्या ओव्हर्स व्यवस्थित खेळू शकतात. आणि हाणामारी करायला धोनी व उथाप्पा आहेतच. दिनेश कार्तिक हा बहुत करुन कैफ टाईपचा बॅट्समन आहे. 'ढकला आणि पळा.' डावाच्या शेवटी फटकेबाजी करायला तो काहीसा कमी पडतो. आणि सध्यातरी मधल्या फळीत जागा नाही. गांगुली तिसर्या क्रमांकावर आल्याने त्याला न आवडणारे उसळते चेंडू फारसे खेळावे लागणार नाहीत. आणि सेहवागच ओपनिंग करत असल्यामुळे गांगुलीला काही फार काळ वाट बघावी लागणार नाही.

गोलंदाजीमध्ये झहीर निश्चितच आहे. नंतरचे दोन आहेत आर पी आणि पठाण. फिरकीमध्ये हरभजन, पोवार आणि चावला तिघे आहेत. शिवाय सेहवागचा ऑफस्पिनर म्हणून उपयोग होईल. त्यामुळे हरभजन किंवा पोवार यांपैकी एकालाच खेळवता येईल. सध्या तरी दोघेही चांगली गोलंदाजी टाकत आहे. पोवारचा इकॉनॉमी रेट चांगला आहे पण डावाच्या शेवटी गोलंदाजीचा अनुभव त्याच्याकडे नाही. आणि अलिकडच्या सामन्यांमध्ये शेवटी धावांचा ओघ रोखण्यात आलेले अपयश पाहता हरभजनचा अनुभव ही महत्त्वाची गोष्ट ठरेल. ४ च गोलंदाज खेळवायचे असल्यामुळे पठाणच्या फलंदाजीकडे थोडा वेळ दुर्लक्षच करणे योग्य ठरेल. निव्वळ गोलंदाजीवर आर पी मूव्हमेंट्मुळे सरस ठरतो. तरीही भारतात आर पी ला मूव्हमेंट मिळणे कठीण असल्यामुळे दोघांमध्ये कुणाला घ्यायचे हा फार मोठा प्रश्न आहे.

म्हणजे शेवटी टीम अशी झाली-

सचिन, सेहवाग (ओपनिंग)

गांगुली, युवराज, द्रविड

उथाप्पा, धोनी,

हरभजन, चावला,

झहीर, आर पी, पठाण

(शेवटच्या दोघांपैकी एक)


Tuesday, September 18, 2007

भारतीय पार्ट-टाईम बॉलर्स

खर तर मी "पार्ट-टाईम" बॉलर्स या विषयावर लिहिणार होतो. पण मग पार्ट-टाईम कोणाला म्हणाव यावर माझच एकमत होईना. कारण "पार्ट-टाईम बॉलर" ह्या शब्दाची भारतात असलेली व्याख्या आणि इतर क्रिकेट खेळणा-या देशातली व्याख्या यात जमिन-आसमानाचा फरक आहे.बाकीच्या सर्व देशात असे कुडमूडे गोलंदाज येतात तेच मुळी फलंदाजाच लक्ष विचलीत करायला. रथी महारथी गोलंदाजांना खेळून थकलेला फलंदाज अश्या 'पार्ट-टाईम' गोलंदाजाची पीस काढायच्या प्रयत्नात आपली विकेट फेकतील हा त्या मागचा आशावाद. आणि ब-याचदा हे अस घडत सुद्धा ! उदा. आत्ता इतक्यातच ईंग्लंड मधील नॅटवेस्ट सीरीज मध्ये केविन पीटरसन नी सचीन तेंडूलकरला पहिल्याच षटकात बाद केले होते. आजच्या घडीला जगात असे बरेच "जाने-माने" 'पार्ट-टाईम' गोलंदाज आहेत. मायकेल क्लार्क, ख्रीस गेल, तिलकरत्ने दिलशान, ग्रॅमी स्मिथ, विरेंदर सेहवाग, सायमंड्स वगैरे वगैरे ... या सर्व गोलंदाजांचा अजुन एक विशेष गूण म्हणजे संघाचा 'ओव्हर रेट' कमी पडत असल्यास तो सुधारण्यात यांचा प्रचंड हातभार लागतो. त्यामुळे जवळपास प्रत्येक एकदिवसीय सामन्यात यांना एकदा तरी गोलंदाजीला बोलावलेच जाते.

पण भारतीय क्रिकेटची प्रत्येक गोष्टच निराळी आहे! भारतीय संघ सामन्यातील प्रमूख गोलंदाजांचे(जे ३,४ किंवा ५ यापैकी कितीही असू शकतात) अपयश भरून काढण्यासाठी(जे ३, ४ किंवा ५ गोलंदाजांना एकाच वेळी येते) या 'पार्ट-टाईम' गोलंदाजांना गोलंदाजी देतो. आणि अश्या वेळी या गोलंदाजांकडून अपेक्षा असते तीनच गोष्टींची !
१. धावा कमी द्यायच्या
२. विकेट काढायच्या
३. डावाच्या शेवटच्या हाणामारीच्या षटकात टिच्चून गोलंदाजी करायची.
आता तुमच्या प्रमूख गोलंदाजांना(?) हे जमत नसेल तर हे बापुडे 'पार्ट-टाईम' पंथाचे गोलंदाज हे कस करणार?

पण नाही. आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला पार्ट-टाईम गोलंदाजांवर खूप प्रेम आहे. बदाणी, दिनेश मोंगीया, सेहवाग, आणि पार्ट-टाईम गोलंदाज शिरोमणी युवराज सिंग ही आमची प्रमूख आणि छूपी अस्त्रे आहेत! कधी कधी सचीन रमेश तेंडूलकर आणि सौरव चंडीदास गांगुली अशी 'इलाईट' लोकही या क्लब मध्ये हजेरी लावतात. हे सगळेच गोलंदाज एक, दोन किंवा फार फार तर तीन ओवर्स फलंदाजाला जखडून(म्हणजे ५ किंवा ६ धावा प्रती ओवर) ठेवू शकतात.
कारण २-३ ओवर्स नंतर त्यांच्या मा-यातील प्रत्येक प्रकारच्या चेंडूची कल्पना फलंदाजाला आलेली असते आणि धावा वाचवणे हे प्रमूख काम असल्यामुळे एकाच प्रकारचे चेंडू आणि ते ही झटापटा टाकणे हे एकच उद्दीष्ट समोर ठेऊन गोलंदाज बॉल टाकत असतात. 'नो व्हेरिएशन ऍंड नो क्रीएटीविटी' अस यांच समीकरण !

पण भारतीय 'थिंक टॅंक' च काय मत आहे देव जाणे. युवराज सिंगला ईंग्लंडमध्ये जे पाच बॉलमध्ये ५ छक्के बसले ते या एकसूरी बॉलींगचा एक अप्रतीम नमुना म्हणून कुठल्याही क्रीकेटविषयक अभ्यासक्रमात स्थान मिळवू शकतात. बर त्याने पहिल्या ३ ओवर्स छान टाकल्या होत्या म्हणून त्याला गोलंदाजी दिली हे भारतीय कप्तानाच म्हणण आपल्याला काही पटत नाही. शेवटी युवराज सिंगने प्रमूख बॉलर्सच्या ओवर्सपैकी ३-४ ओवर्स किफायतशीरपणे कमी करण्यात महत्वाच काम केल अस न मानता तोच भारताचा तारणहार आहे अस मानून आपले कप्तान त्याल बॉलींग देतात आणि तो पुढच्या ६ चेंडूत ५ छक्के देतो ही गोष्ट तुम्हाला तरी पटते का?

बर आपल्या चुकांमधून शिकायच असत हे भारतीय क्रिकेट टीमला माहितीच नाहीये. कारण परवाच्या २०-२० मॅच मध्ये युवराजने २ ओवर्स मध्ये केवळ १२ धावा दिल्या म्हणून युवराजला परत बॉलींग देण्याचा धोणीचा निर्णय चुकीचा ठरला व युवराजला त्या ओवर मध्ये ३ छक्के बसले, एकूण धावा २५ ! पठाणच्या २ ओवर्स बाकी असताना युवराजला बॉलींग देण्याचा निर्णय साफ चूक होता असे ब-याच क्रीकेट प्रेमींचे मत आहे. पिटरसनने सचीनची विकेट घेतली असूनही ईंग्लंडनी त्याला त्यानंतर एकही ओवर दिली नाही यावरून त्यांचा 'क्रिकेटींग सेंस' दिसून येतो.

भारतीय संघाला कधी पुर्ण क्षमतेने गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज मिळणारेत देव जाणे, पण भारतीय कप्तानांनी आपल्या चुकांची पुनरावृत्ती तरी टाळावी आणि 'पार्ट-टाईम' गोलंदाजांना 'पार्ट-टाईमच' गोलंदाजी द्यावी ही माफक अपेक्षा .. !

Saturday, September 15, 2007

द्रवीडचा राजीनामा

"भारतीय क्रिकेटमध्ये तसही सतत काही तरी सनसनाटी घडत असत आणि तुम्ही म्हणता फक्त आमच्याच संघाला सनसनाटीची आवड आहे." इति एका पाकिस्तानी खेळाडूची द्रवीडच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची बातमी फुटल्यानंतरची प्रतिक्रीया !


गुरु चॅपेल च्या नियुक्तीनंतर तर या प्रकाराला (सनसनाटी) उधाण आल होत. चॅपेल आल्यानंतर गांगुलीला डच्चू मिळाला आणि द्रवीड कर्णधार झाला. तस पाहता गांगुलीला डच्चू मिळावा अस जवळपास प्रत्येक भारतीयाला वाटत होत कारण एरवी तोफेसारखी धडाडणारी गांगुलीची बॅट जवळपास वर्षभर दिवाळीतल्या टिकल्या फोडणा-या बंदुकीसारखी झाली होती, चॅपेल हे एक निमित्त झाल!

पण त्यानंतर जवळपास २ वर्ष भारताच्या सर्वात सातत्यशील फलंदाजाकडे भारतीय संघाच कर्णधारपद आल. आणि चॅपेल-द्रवीड जोडगोळीने स्वप्नवत सुरुवात केली. श्रीलंका ६-१, दक्षीण अफ्रीका २-२ बरोबरी अशी चमकदार कामगीरी केल्यावर विंडीज मध्ये १-० ने कसोटी मालिकेत विजय ! भारतीय संघ विश्वचषक जिंकणार आणि राहुल द्रवीड हा या परिकथेचा नायक होणार अशी चित्र रंगवली जाउ लागली.

पण हाय रे किस्मत ! परिकथा परिकथाच निघाली. द्रवीडने यश चाखल, आणि जितक यश पाहिल तितकच अपयश ही पाहील. विंडीज मध्ये ४-१ नी मार खावुन आलेला भारतीय संघ नंतर चँपीयन ट्रॉफी मध्ये गळपटला. त्यानंतर विश्वचषकात तर कमालच झाली. नवख्या बांग्लादेशने पहिल्याच सामन्यात "जगातील (कागदावरील) सर्वात बलाढ्य फलंदाजीचे " वाभाडे काढले. त्यानंतर भारत श्रीलंकेकडून सपाटून हारला आणि मानहानीकारकरित्या पहिल्या फेरीतच बाद झाला. फलंदाजांचे अपयश हा या सर्व दारूण पराभवांमधला समान दुवा होता.विश्वचषकापर्यंत सर्वांच्या गळयातला ताईत असलेल्या द्रवीडच्या नावाने ओरडा सुरु झाला. जणु काही सर्व पराभवांना द्रवीडच जबाबदार आहे. जणु काही द्रवीडच प्रत्येक सामन्यात ६-७ वेळा फलंदाजीला येउन अपयशी ठरतोय. भारतीय क्रिकॆट हे उगवत्या सुर्याला पुजत आणि द्रवीड मावळतीकडे वाटचाल करतोय अशी हाकाटी सुरु झाली.

तरी निवड समितीने दक्षीण अफ्रीकेच्या खडतर दो-यावर त्यालाच कर्णधार नेमले. आणि भारतानी २०-२० सामना आणि १ कसोटी सामना वगळता विजय काय असतो हे पाहिले नाही. घरी "शेर" आणि बाहेर "ढेर" ह्या एका वाक्यात भारतीय संघाची हेटाळणी केली जाउ लागली. त्यातच गांगुलीने दमदार पुनरागमन केले असल्यामुळे त्याला कर्णधार करा असा एक सूर सुरु झाला.पण ईंग्लंडच्या दौ-यावर कमाल झाली. भारत कसोटी मालिका १-० जिंकला आणि एकदिवसीय मालिकेत अगदी पुसट फरकाने हारला (प्रत्यक्षात पराभव ३-४ असा झाला असला तरी खेळाच्या दर्ज्यातला फरक ०-७ असा होता हे प्रत्येक क्रिकेटप्रेमी कबूल करेल ! ).

आणि या 'कम-बॅक' नंतर द्रवीड कर्णधारपद सोडत असल्याची बातमी आली. द्रवीड कर्णधार विरुद्ध द्रवीड फलंदाज यातला फलंदाज मरणपंथाला लागायच्या आत कर्णधारपदावरुन उतरण्यातच शहाणपणा आहे हे द्रवीडने ओळखले आणि हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. तसे पाहता द्रवीडची कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांतील सरासरी ४४ आणि कसोटीतली सरासरी ५१ आहे आणि कुठलाही क्रिकेट पंडीत याला "घसरण" म्हणू शकत नाही. पण द्रवीड हा आकड्यांच्या चादरीत स्वत:ला गुरफटून घेणारा फलंदाज नाही. द.अफ्रीका आणि ईंग्लंड दो-यांमध्ये ६ कसोटी सामने मिळून द्रवीडने जवळपास २५०-३०० धावा केल्यात ज्या द्रविडीयन स्टॅंडर्ड ने फारच किरकोळ आहेत ! आणि स्वत:चा खेळ चांगला असावा याबद्दल प्रचंड आग्रही असलेल्या द्रवीडला हीच बाब खटकली असणार. १०० कोटी लोकांच्या अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेउन मैदानावर उतरणा-या, प्रतिस्पर्ध्याला ७ सामन्यांच्या मालिकेत एकदाही सर्वबाद करू न शकलेल्या, एका सामन्यात ३२९ धावा काढून ९ धावांच्या फरकाने केविलवाणा विजय मिळवणा-या, मागच्या सामन्यात ३०० च्या वर धावा काढल्यानंतर पुढच्याच सामन्यात २०० धावाही करु न शकणा-या आणि एकाच सामन्यात ५ झेल आणि १ स्टंपींग सोडणा-या संघाची धूरा सांभाळताना द्रवीड स्वत:तल्या फलंदाजाला योग्य न्याय देउ शकला नाही. वरून निवड समितीतली शहाणी लोकं, क्रिकेटच्या खेळातील पैश्याची मलई ओरपणारे लोक आणि काहिही झाल की 'मॅच का मुजरीम" शोधणारा मिडीया यांच्याकडून कर्णधाराची होत असलेली घुसमट वेगळीच !


पण द्रवीडने घेतलेला निर्णय 'लॉंग-टर्म' चा विचार करता योग्यच आहे. आज भारतापुढे अनेक खडतर दौरे आ वासून उभे असताना भारताला त्याच्या सध्याच्या घडीतल्या सर्वोत्तम फलंदाजाकडून धावांच्या बरसातीची अपेक्षा आहे आणि तीच पूर्ण करण्याची मनिषा बाळगून द्रवीडने भारतीय कर्णधारपदाचा काटेरी मुकूट स्वत:हून उतरवून निवड समितीकडे भिरकावलाय. आता हा काटेरी मुकूट कोणाच्या डोक्यावर चढतो हे बघणे रोचक ठरेल. मग परत एकदा आहेच "ये रे माझ्या मागल्या". परत नवा भिडू नवा राज्य या प्रकारे नवा कोच नवा कॅप्टन !

Friday, September 14, 2007

आपले commentators

स्टार क्रिकेट ही वाहिनी सुरू झाल्यापासून मॅच बघायला जरा जास्तच मजा यायला लागली आहे. एका वेळी दोन दोन चॅनेलवर मॅच चालू म्हणजे ताटात आमरस आणि श्रीखंड. दोन्ही गोडच!! पण चव मात्र वेगळी. इथे चवीचा प्रश्न नाही तर कॉमेंटरी वेगळी. एकीकडे हिन्दी तर एकीकडे इंग्रजी! त्यामुळे जर आपला बॅट्समन नांगर टाकून बसला (इथे बॅट्समन हा शब्द गौतम गंभीर किंवा नॅटवेस्टच्या पहिल्या मॅचमध्ये धोनी असा वाचावा) किंवा आपल्या गोपाळ गणेशानी (आगरकर ओ, अजित आगरकर गो गं चा वसा चालवत आहे. 'आधी समाज सुधारा मग स्वातंत्र्य मिळवू' तसं याचं 'आधी धोनीची कीपिंग सुधारा -आडवे तिडवे बॉल टाकून- मग विकेटचं बघू'. पण बॅट्समन लेकाचे मध्ये बॅट घालून त्याचा प्रयत्न हाणून पाडतात. कारण धोनीची कीपिंग सुधारली तर किमान १५-२० रनचा फटका!) स्टम्प सोडून सगळीकडे चेंडू टाकायला सुरुवात केली की आपल्याला समोरचे चित्र इच्छा नसताना बघत बसावे लागत नाही. फक्त इतकंच करायचं, स्टार क्रिकेट लावायचं आणि डोळे मिटून घ्यायचे.

3मग मोहिंदर अमरनाथ आणि ग्रुप -मदनलाल, अरुण लाल, अन्शुमन गायकवाड, चेतन शर्मा, झहीर अब्बास, अतुल वासन, मणिंदर सिंग- यांचा एक अंकी, (एका वेळी) दोन पात्री, धमाल विनोदी (ऐकाल तर हसाल, न ऐकाल तर फसाल) प्रयोग ऐकायचा. यातले काही जण इंग्रजी आवृत्तीकडे दिसतात पण लेव्हल तीच. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की सगळ्याना एका प्रकारचेच विचार, समान आणि भरपूर चुका, चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले म्हणणे हे सारे आतून आणणे कसे जमते? आणि 'आम्ही हिंदी बोलतो' हे दाखवण्यासाठी ते जे भाषांतर करतात ते कधी कधी झीट आणणारे असते.

परवाच इंग्लिश गोलंदाज गांगुलीवर उसळत्या चेंडूंचा मारा करत होते आणि कमेंटेटरने (त्याचे नाव टिपून न घेण्याची महान घोडचूक आमच्या हातून झाली) 'short ball' याचे शब्दश: भाषांतर केले की 'छोटी गेंद'. माझी हसून हसून पुरेवाट होतेय तोपर्यंत पुन्हा तसाच चेंडू आणि 'और एक बार छोटी गेंद अँडरसन द्वारा और गांगुली फिर एक बार चुके शॉट लगाने मे' मला शेवटपर्यंत कळाले नाही की 'गेंद' छोटी कशी झाली? युवराज सिंग या वेळी जरा फॉर्मात होता त्यामुळे जेव्हा तो बॅटिंगला यायचा आणि एखादा बॉल खेळून होतोय न होतोय तोपर्यंत यांचं चालू- 'आज युवराज बढिया फॉर्म मे नजर आ रहे है. बढिया टायमिंग और फूटवर्क तो लाजवाब (?)' दोन बॉल खेळल्यावर (त्यातही एक सोडून दिला होता) यांना इतकं कळतं?

सचिन उत्कृष्ट इनिंग्ज खेळत होता. त्याची चारही अर्धशतके डोळे दिपवून टाकणारी होती. त्यातही शेवटच्या दोन वेळी तो अक्षरशः बोलर्सवर तुटून पडला होता. पण यांचं मात्र 'सचिनमे अब वो बात नही रही.' मैदानात सगळ्या बाजूना धावा, मस्कारेन्हासला उत्तुंग षटकार, पुढे येत मारलेले you bowl where you want, i will hit where i want वाले शॉट्स हे सगळे राहिले बाजूला. म्हणे वो बात नही रही. यांच्यापैकी एकानेही कधी बघणार्याचा अंत न पाहता सलगपणे ५० धावा काढल्याचे कधी ऐकिवात नाही. सगळे नुसतेच तोंडची वाफ दवडणारे!! तो चेतन शर्मा म्हणतो द्रविडला शेवटी कुणाला बोलिंग द्यायची हे कळत नाही. त्याच्या जागी मी असतो तर यांव केलं असतं. असं कोण म्हणतोय? ज्याने शेवटच्या बॉलवर ६ रन्स हव्या असताना जावेद मियाँदादला पायावर फुलटॉस दिला होता. तोही फायनल मॅचमध्ये. त्याला मराठी येत नाही, नाहीतर 'तेथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे कामचि नोहे' हे त्याला कुणीतरी सुनावलेच असते. सचिन बॅटिंग करतो हे यांना खुपते. लवकर आऊट झाला तर 'आता सचिन म्हातारा झालाय. रिटायर व्हायला पाहिजे त्याने.' (तो लवकर आऊट झाला असला तरी बर्याचदा त्यातही त्याने सगळ्या तरुणांपेक्षा जास्त धावा केलेल्या असतात.) आणि चांगलं खेळला तरी 'He is playing well. This is the right time for him to retire.' धड त्याला सुखाने खेळू देत नाहीत नि आम्हाला काहीतरी चांगलं बघितल्याचा आनंद मिळू देत नाहीत. सगळे जणू पिंपळाच्या झाडाला लटकणारे मुंजे! जवळ गेलं की मानगुटीवर बसतात.

मग एकच पर्याय राहतो. ऐकायचं, हसायचं आणि सोडून द्यायचं (आजकाल मराठी माणसाचा स्थायीभावच झालाय हा). मग मी तरी हे सारं कशाला लिहितोय? काय करणार. 'दुसर्याचा तो बाब्या नि आपलं ते कार्टं' म्हणणारी ही मंडळी बघितली किंवा ऐकली की राहवत नाही हो. समोरच्याच्या पायातलं कुसळ काढणार्यांच्या डोळ्यातलं मुसळ आपणच काढायला हवं आता!!

Thursday, September 13, 2007

मवाळ सेहवाग??

आपल्या आक्रमक खेळाला लगाम लावण्याचा निर्णय वीरेंदर सेहवागने घेतला आहे. रविवारी येथे आपले मनोगत व्यक्त करताना पुनरागमनासाठी सज्ज असलेला सेहवाग म्हणाला, 'चांगल्या सुरूवातीनंतर विकेट फेकण्याची गफलत करायची नाही असा मी निर्धार केलाय.' इति मटा.

वीरुने म्ह्टलय खरं. पण म्या अज्ञान्याची अशी शंका की 'चांगली सुरुवात' आणि आपले साहेब यांचे विळ्या- भोपळ्याचे सख्य!! मग वीरू आपले शब्द खरे कसे ठरवणार? आणि या वाक्यातून मला असा वास येतोय की चांगली सुरुवात झाली तर विकेट नाही फेकणार म्हणजे (आमच्यासाठी) जुन्या काळात, मनोज प्रभाकर आणि नयन मोंगिया ४० ओव्हर झाल्या की फलंदाजीला येऊन जसे पिदवायचे तसा हा करणार? अरे २० षटकाच्या सामन्यात तू आक्रमणाला लगाम घालणार मग काय उपयोग त्या आक्रमणाचा? हे म्हणजे एखाद्या सैनिकाला राजाने दरबारात सांगावे की इथे तलवार म्यानात टाक, उगीच कुणालातरी लागेल. आणि त्या सैनिकाने रणांगणात गेल्यावर सुद्धा राजाची आज्ञा म्हणून घुम्यासारखे बसून राहावे. जिथे जे करायला हवं, तिथे तेच आणि तिथेच ते करायचं असतं. माझ्यामते सेहवागने चांगली सुरुवात होईपर्यंत थांबावे (म्हणजे एक ओव्हर. कारण सेहवाग एक ओव्हर टिकला तर ती त्याच्यासाठी चांगली सुरुवात असते) मग फटकेबाजी सुरु करावी.

हे सारे आम्ही वीरुभाईच्या आकसापोटी लिहित आहोत असे मात्र मुळीच नाही. कधी काळी आम्हीदेखील त्याच्या फलंदाजीवर फ़िदा होतो. आणि फलंदाजीपेक्षा त्याच्या डेरिँगबाज स्वभावावर. शोएब आणि ली ला चहोबाजूना धाडणारा, २९५ वार असताना सकलेन ला पुढे येऊन उचलण्याची हिम्मत असलेला, न्यूझीलंड मध्ये पानगळती प्रमाणे बाकीचे साथीदार एक अंकी धावा करून ग़ळत असताना दोन शतके ठोकणारा सेहवागही आम्ही पाहिला आहे. नुसती बॅटिंगच नव्हे तर त्याच्या slow offspin चेही आम्ही फॅन!! श्रीलंकेत साऊथ आफ्रिकेविरुद्ध आशा सोडून दिलेला सामना एकहाती आपल्या spin बरोबर फिरवला होता. ४० व्या ओव्हरपर्यंत सगळ्या मुख्य बोलर्सनी मार खाल्ला की शेवटी कोण या प्रश्नाला सेहवाग उत्तर म्हणून फिट्ट बसत होता.मग अचानक काय झालं?

तोच सेहवाग (मुख्यतः) पहिल्या ते (जास्तीत जास्त) तिसर्या षटकापर्यंत कीपर ते स्लीप या पट्यात कॅचिंग प्रॅक्टिस देऊन जायला लागला. आधी आउट होत नव्हता असे नाही. पण निदान ३०-४० धावा तरी करत होता. आणि आता ५ सामन्यातून एकदा ३० धावा काढल्या की धन्य वाटून घेणारा सेहवाग बघवत नव्हता. आधी टायमिंग मध्ये झाकले जाणारे त्याचे पदलालित्य (सेहवाग जे काही करतो त्याला 'पायांची हालचाल' हाच शब्दप्रयोग जास्त योग्य आहे) आता सपशेल उघडे पडत होते. कधी काळी स्विंग बोलिंगला लीलया धुणारा सेहवाग सरळ बॉलवर सरळ कॅच देऊन सरळ तंबूत परतत होता. शेवटी आपल्याच लोकाना दया आली. एखाद्याची अब्रू किती घालवायची? मग बाहेर बसवला त्याला.

आता बघू, काय करतो पठ्या!! घोडमैदान लांब नाही. कमॉन सेहवाग..

उंटावरचे शहाणे

सलामीचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. एक आहेत 'समीर भिडे', ज्यांच्याकडे बर्याच समन्यांचा अनुभव आहे. आणि दुसर्या बाजूला पदार्पण करत आहेत 'सागर पिसाळ' . बघुया ही जोड़ी फटकेबाजी करु शकते का..